जळगाव – भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीचा लैंगिक अत्याचार करीत क्रूर हत्या केल्या प्रकरणाचा खटला चालविण्याची तयारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दर्शविली आहे. मंगळवारी भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. त्यांनी नराधमाला फाशीच होईल, असे सांगितले. त्यांनी पीडित कुटुंबाकडून माहिती जाणून घेतली.
भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा वाघ यांनी मंगळवारी गोंडगाव येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, सोमनाथ पाटील, समाधान पाटील, कपिल पाटील, कजगावचे भाजप शहराध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी होते. प्रदेशाध्यक्ष वाघ यांनी या कुटुंबाशी संवाद साधून त्यांच्याकडून माहिती जाऊन घेतली. नराधम हा पीडित कुटुंबाच्या घराशेजारीच राहत असून, त्याच्या कुटुंबाशी कोणतेही वाद नव्हते. मात्र, या नराधमाने लज्जास्पद कृत्य करून मुलीची निर्घृण हत्या केली, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष वाघ यांना देण्यात आली. या प्रकरणातील अनेक पैलू प्रदेशाध्यक्ष वाघ यांनी पीडित कुटुंबाकडून जाणून घेतले. त्यांनी भाजपतर्फे कुटुंबाला मदतीचा धनादेशही प्रदान केला. याप्रसंगी आम्हाला न्याय हवा आणि या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा पीडित कुटुंबाकडून व्यक्त करण्यात आली. त्यावेळी आमदार चव्हाण यांनी थेट अॅड. निकम यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून गोंडगाव येथील घटनेप्रकरणी सरकारतर्फे बाजू मांडण्याची विनंती केली. ती अॅड. निकम यांनी मान्य केली, असे प्रदेशाध्यक्ष वाघ यांनी सांगितले. सरकारकडून तशी परवानगी मिळवण्यासाठीची जबाबदारी आमदार चव्हाण यांनी घेतली आहे.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, गोंडगावची घटना ही क्लेशदायक आणि अतीव दुःख देणारी आहे. पोलिसांनी काही तासांत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. शासन पूर्णपणे पीडित कुटुंबासोबत आहे. आई म्हणून मला विचारा, मीही म्हणेन अशा नराधमाला फाशीच दिली पाहिजे. आता अशी विकृती समाजाने ठेचून काढली पाहिजे. त्यासाठी समाजातील सर्वांनी जबाबदारी घेणे गरजेचे आहे. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी अशा नराधमांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्या नराधमाला फाशी व्हावी, ही सर्वांचीच इच्छा आहे. महिलांवरील अत्याचारांसाठी कायदे सक्षम असले, तरी त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे अपेक्षित आहे, असेही प्रदेशाध्यक्ष वाघ यांनी सांगितले.
“मेरी माटी, मेरा देश” हा उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर शालेय विद्यार्थ्यांची वृक्ष दिंडी