जळगाव – जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक आणि चोरीच्या विरोधात महसूलसह पोलीस विभागासोबत उपप्रादेशिक परिवहन विभाग सक्रिय झाला असून, शनिवारी पहाटेपासून तिन्ही विभागांच्या सुमारे अडीचशे अधिकारी व कर्मचारी सहभागी असलेल्या संयुक्त पथकांनी थेट नदीपात्रांत उतरत धडक कारवाईत सुमारे 53 पेक्षा अधिक ट्रॅक्टर ट्रॉली, 14 डंपर व मालमोटारींसह हजारो ब्रास वाळूसाठा जमा केला. जिल्ह्यात धडक कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक व चोरीचा विषय राज्यभरात गाजत आहे. विधानसभेतही वाळूचा विषय चांगलाच गाजला होता. सध्या वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाळमाफियांपुढे प्रशासनही अक्षरशः हतबल झाल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेताच आयुष प्रसाद यांनी सुरुवातीलाच अवैध वाळू वाहतूक व चोरी रोखण्याबाबत सूतोवाच केले होते. वाळूतस्करी रोखण्याची आपली प्राथमिकता असेल, असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगत एकप्रकारे वाळूमाफियांना सूचक इशाराही दिला होता. याअनुषंगाने मध्यंतरी जळगावसह जिल्हाभरात काही प्रमाणात कारवाई करण्यात आली होती.
आता अवैध वाळू वाहतूक व चोरी रोखण्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभागासोबत उपप्रादेशिक परिवहन विभाग सक्रिय झाला असून, नाशिक येथील महसूल खात्याच्या पथकासोबत स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी थेट गिरणा नदीपात्रात उतरले. परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रावले यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे निरीक्षकांसह महसूल व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांचा फौजफाटा नदीपात्रात उतरला होता. या संयुक्त कारवाईत वाळू तस्करांना जोरदार दणका देण्यात आला असून, यात पोलिसांनी अनेक वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर ट्रॉली, डंपर व मालमोटारी जमा केल्या आहेत.
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सांगितले की, जळगावसह जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक व चोरी रोखण्यासाठी महसूल, पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागासोबत संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत 53 पेक्षा अधिक ट्रॅक्टर ट्रॉली, 14 डंपर, मालमोटारी जमा आहेत. आता वाहनमालकांना कागदपत्रांसह बोलाविण्यात आले आहे. ज्यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता असेल, त्यांना सोडून देण्यात येणार आहे. मात्र, कागदपत्रांची अपूर्तता असलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे. वाहनांबाबतचीही कागदपत्रे नसतील तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. आता सर्व वाहने प्रशासकीय इमारतीच्या आवारात जमा करण्यात आली आहेत. अवैध वाळू वाहतूक व चोरी रोखण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मध्यंतरी बंदोबस्ताकामी सर्व अधिकारी, कर्मचारी व्यस्त होते. त्यामुळेच कारवाईची मोहीम राबविली गेली नसल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
गोंडगाव बालिकेला न्याय द्या ! सकल मराठा समाजाची मंत्रालयावर धडक
महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गणवेश व वह्यांचे वाटप