जळगाव : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. आता प्रादेशिक पक्षांना त्यांचा पराभव लक्षात आला आहे. त्यांचे अस्तित्व टिकवायचे असेल तर काँग्रेसमध्ये जावेच लागेल. त्यामुळे चार जूनपर्यंत शरद पवारांचीं राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्यातून त्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे, असे भविष्य उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री (Devendra Fadnvis) देवेंद्र फडणवीस यांनी वर्तविले.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ बुधवारी (8 मे) पाचोरा येथील भडगाव रस्त्यावरील कैलामाता मंदिरालगतच्या पटांगणात दुपारी जाहीर सभा झाली. सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी इंडिया आघाडी, महाविकास आघाडीसह शरद पवार, उद्धव ठाकरेंवर जोरदार शब्दअस्त्र सोडले. ही लोकसभा निवडणूक गल्लीची नव्हे, तर दिल्लीची निवडणूक आहे. जळगावात मंगळवारी रात्री झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंच्या भाषणात देशाच्या विकासाचा एकही मुद्दा नव्हता आणि दलित, आदिवासी, ओबीसी, भटके-विमुक्तांसह समाजातील गरिबी कशी दूर करू असे कोणतेही विकासाचे मुद्दे नव्हते. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महायुतीच्या नेत्यांवर आसूड ओढले. चार जूनला बिळातून बाहेर काढून मारू, असे ठाकरेंनी म्हटले आहे. मात्र, महायुतीतील सर्व लोक वाघासारखे आहेत. त्यांच्यात वाघांना हात लावण्याची हिंमत आहे का? ते काय हात लावणार? पण आता त्यांचे डोके फिरले आहे, अशी बोचरी टीका फडणवीस यांनी ठाकरेंवर केली.
लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे शरद पवार म्हणाले होते. या मुद्यावर फडणवीस यांनी ते सांगताहेत तर ते खरे आहे. आता त्यांचा पराभव त्यांना लक्षात आला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते, ज्यावेळी काँग्रेसशी युती करण्याची वेळ येईल, त्यावेळी माझ्या शिवसेनेचे दुकान बंद करेल. आता तर त्यांच्या मुलानेच काँग्रेसशी युती केली, तर या निवडणुकीनंतर ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. त्याचे शिल्पकार शरद पवार असणार आहेत, मग त्यांचे अस्तित्वच उरणार नाही, असा चिमटा फडणवीस यांनी शरद पवार व उद्धव ठाकरेंना काढला.
खरे म्हणजे, जळगाव लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी भाजपच्या उमेदवाराला तुम्ही भरभक्कम पाठिंबा दिला. मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणल्यानंतर पाच वर्षांत त्यांचा जो व्यवहार होता. खरे म्हणजे आता निवडणुकीचा काळ आहे. सर्व गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात. त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. आता बोलणे उचित होणार नाही; पण एकदा त्यांनीही आत्मचिंतन केले पाहिजे की, त्यांचे तिकीट का कापले? तर त्यांच्या लक्षात येईल की, काय काय चुका त्यांच्या हातून झाल्या आहेत. खरे म्हणजे त्यांचे तिकीट कापून आम्ही एकप्रकारे त्यांना त्या ठिकाणी वाचवले, असेच मी म्हणेन. ज्या मार्गाने ते चालले होते, त्या मार्गाने जाण्यापासून आम्ही त्यांना परावृत्त केले आहे; पण मी यापेक्षा अधिक त्यांच्याबद्दल बोलणार नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात गेलेले माजी खासदार उन्मेष पाटील यांचे नाव न घेता, त्यांना आत्मचिंतन करायचा सल्ला दिला.
ही निवडणूक साधी नव्हे, तर या निवडणुकीतून देशाचा नेता निवडायचा आहे. देश कोणाकडून सुरक्षित राहील? कोण देशाला विकासाकडे नेईल? कोण सर्वसामान्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करू शकतो? कोण आपल्या जीवनात परिवर्तन आणू शकतो? याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. आता दोन पर्याय आहेत, एक म्हणजे विश्वगौरव असलेले, विकासपुरुष असलेले आपले नेते नरेंद्र मोदी आहेत. मोदींच्या नेतृत्वात महायुती आहे. दुसरीकडे आहे राहुल गांधी. त्यांच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी आहे. 24 पक्षांच्या खिचडीत कोण कोणाला नेता मानायला तयार नाही. मला पाहा आणि फुलं वाहा, अशाप्रकारची 24 पक्षांची खिचडी आहे. आपली महायुती म्हणजे विकासाची रेल्वे आहे. तिला मोदींचे भक्कम इंजिन लागले आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या बोग्या लागल्या आहेत. त्यात दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, ओबीसी, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, अल्पसंख्याक, भटके-विमुक्त सर्वांना बसायला जागा आहे. सगळ्यांना बसवून मोदींची रेल्वे सबका साथ- सबका विकासाकडे जात आहे. दुसरीकडे अवस्था काय आहे, राहुल गांधींकडे फक्त इंजिन आहे. त्या इंजिनाला बोगी नाही. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, स्टॅलिन, ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव आणि मुलायमसिंग यांचा पोरगा म्हणतो. मी इंजिन आहे. इंडिया आघाडीला फक्त इंजिन आहे. मात्र, एकही डबा नाही. इंजिनमध्ये सर्वसामान्यांना बसायला जागा असते का? इंजिनमध्ये फक्त चालक बसतो. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया व प्रियांका, उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य, शरद पवारांच्या इंजिनमध्ये केवळ सुप्रियांना जागा आहे. तुमच्यासाठी जागा फक्त मोदींच्या रेल्वेत आहे. ज्याक्षणी स्मिता वाघ यांच्या कमळाचे बटन दाबाल, तेव्हा तुमची जळगावची बोगी मोदींच्या विकासाच्या इंजिनला लागेल, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
इंडिया आघाडी, महाविकास आघाडीवाले हे पोपटासारखे मिठू मिठू बोलायला लागले आहेत. भाजपचा चारशेपार जागा केल्या, तर ते संविधान बदलणार आहेत, असे खोटे बोलणे सुरू केले. ते इतके खोटारडे लोक आहेत, खोटे बोलण्यात ऑलिम्पिक ठेवले तर महाविकास आघाडीला सर्व पदके मिळतील. सकाळपासून रात्रीपर्यंत खोटे बोलतच राहतात. मोदींनीच सांगितले आहे, या भूतलावर, चंद्रावर सूर्य आहे, तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणीही बदलू शकणार नाही. संविधान मला गीता, कुराण, बायबलपेक्षाही महत्त्वाचे आहे. मोदी म्हणतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते म्हणून माझ्यासारखा गरिबाचा आणि चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला. संविधानाची संरक्षण करणारे मोदी आहेत. माझा काँग्रेस व महाविकास आघाडीवाल्यांना प्रश्न आहे, अरे सांगा, 1975 मध्ये इंदिरा गांधींनी दोन वर्षे भारतीय संविधान गुंडाळून कपाटात बंद करून ठेवले होते आणि ताणाशाही आणली होती, त्यावेळी तुमची तोंडं का उघडली नाहीत? 70 वर्षे काश्मीरमध्ये भारतीय संविधान लागू नव्हते. कारण, काश्मीरमध्ये दलित, आदिवासी, ओबीसींना 70 वर्षे आरक्षण नव्हते. मोदींनी भारतीय संविधानातील 370 कलम हटवून पूर्णपणे काश्मीरला लागू केले आणि सर्वांना आरक्षण दिले. आरक्षण देणारे आणि संविधान लावणारे मोदी आहेत. काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता, असे सगळे हे संविधानविरोधक एकत्र आले आहेत. हे सर्व जनता जाणते, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
करोनाकाळात राहुल गांधी पंतप्रधान असते, तर काय अवस्था झाली असती. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळी ते अडीच वर्षे घराबाहेर पडले नाहीत. नेताच घाबरून घराबाहेर पडला नाही. मात्र, भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी घराबाहेर होतेे. जगात चार देशांत करोनाची लस होती, ते देश वाट पाहत होते, भारत आपल्याकडे येईल, आपल्याकडे भीक मागेल आणि भिकेमध्ये लसी देऊन टाकू. मात्र, मोदींनी देशभरातील शास्त्रज्ञांना एकत्रित करून करोनाची लस तयार केली आणि ती जनतेला दोनदा देण्यात आली. शिवाय, इतरत्रही लस निर्यात केली, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, किशोर पाटील, जयप्रकाश बाविस्कर, दिलीप वाघ, ए. टी. पाटील, उमेदवार स्मिता वाघ, ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, उज्ज्वला बेंडाळे, अमोल शिंदे, रावसाहेब पाटील, जितेंद्र जैन,गणेश पाटील, किशोर बारावकर, पिपल्स रिपब्लिकचे राजू मोरे, आर पी आयचे आनंद खरात,किरण शेलार आदींसह महायुतीतील मित्रपक्षांचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री महाजन, मंत्री पाटील, उमेदवार स्मिता वाघ यांनी मनोगतात महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. मधुकर काटे यांनी सूत्रसंचालन केले. आमदार किशोर पाटील यांनी प्रास्ताविक केले.
पाचोरा येथील जेष्ठ कवी पांडुरंग सुतार “कविवर्य कुसुमाग्रज” पुरस्काराने सन्मानित