राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरं पान लावून देण्यासह विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्याही मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अशी माहिती दिली आहे.राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितल्याप्रमाणे, सरकार शालेय विद्यार्थ्यांचं ओझं कमी करण्याच्या तयारीत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं खूप होतं ही समस्या अनेक वर्षांपासून मांडली जात आहे. विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचं ओझं कसं कमी करता येईल याबाबत सतत सरकार आणि काही सामाजिक संस्था विचार करत असतात.
यासाठी पुस्तकांमध्येच कोरी पानं कशी लावता येतील, किंवा नोट्स काढताना पुस्तकांमध्येच कशा देता येतील यावर विचार सुरु आहे. तसंच शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरं पान लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थी आणि पालकवर्ग सतत दप्तराचं ओझं कमी व्हावं म्हणून मागणी करत होते. अनेक विद्यार्थ्यांना या ओझ्यामुळे काही त्रासही सहन करावे लागत होते.
मात्र आता शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल असं सरकारचं म्हणणं आहे. या निर्णयाचा गरीब विद्यार्थ्यांना फायदा होणार असून राज्यातील लहान मोठ्या गावांतील गरीब विद्यार्थ्यांना या मोफत वही आणि पुस्तकांचा फायदा होणार आहे. त्यांच्या शिक्षणासाठी या पुस्तकांची बरीच मदत होणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना मोफत वही आणि पुस्तकं मिळाल्यामुळे त्यांची शिक्षणाची गोडी वाढण्यात मदत होईल