जळगाव – चाळीसगाव शहरातील टोळीने अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चौघांना एमपीडीए कायद्यांतर्गत जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करीत दोन वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आले. यासंदर्भातील जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शनिवारी आदेश काढले.
जिल्ह्यातील विविध भागांत टोळी करून चोरी व लुटमार करणार्या गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबतचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मागविले होते. त्याअनुषंगाने चाळीसगाव येथील शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांनी लुटमार करणार्या चार जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार केला होता. चोंग्या ऊर्फ तुषार महेंद्र जाधव (26, रा. नारायणवाडी, पेट्रोलपंपाजवळ, चाळीसगाव), अभय ऊर्फ अभ्या हिंमत लोहार (19, रा. प्लॉट एरिया, चाळीसगाव), भूपेश ऊर्फ भुर्या यशवंत सोनवणे (23, रा. आर. के लॉन्सजवळ, चाळीसगाव), धनंजय ऊर्फ धन्या बाळासाहेब भोसले (25, रा. स्वामी समर्थनगर, चाळीसगाव) यांच्यावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल वेगवेगळे 18 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात टोळीने चाळीसगाव शहरात दहशत पसरविणे, टोळीची नागरिकांत भीती निर्माण करणे, नागरिकांच्या जीवितास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण करणे यांसह इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने चौघांवर हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला होता. त्याअनुषंगाने त्यांनी तो शनिवारी मंजूर करीत चौघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.