जळगाव शहरासह जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांसह रोहित्रे प्रभावित होऊन जिल्हा अंधारात बुडाला होता. जिल्ह्यातील सुमारे दोन हजार सातशेवर वीज रोहित्रे प्रभावित झाली होती. रविवारी सकाळी आठपर्यंत महावितरणतर्फे युद्धपातळीवर साडेतेराशे वीज रोहित्रांमधून पुरवठा सुरळीत करण्यात आला. सायंकाळपर्यंत उर्वरित सर्व वीज रोहित्रांमधून पुरवठा सुरळीत होईल, असा दावा करण्यात आला. दरम्यान, सप्टेंबरमधील आठ-दहा दिवसांत अतिवृष्टीसह पुरामुळे 175 गावे बाधित झाली असून, पाच हजारांवर शेतकर्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्यानंतर बाधित शेतकर्यांची संख्या निश्चित होईल.
गणेश चतुर्थीपासून पुन्हा पाऊस परतला आहे. शहरासह जिल्ह्यात शनिवारी (23 सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. तो पहाटे पाचपर्यंत सुरूच होता. जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टी, तर काही भागांत मुसळधारा कोसळल्या. जिल्ह्यातील नद्यांसह नाले-ओढे वाहू लागले आहेत. शहरातील मेहरुण, तांबापुरा, पिंप्राळा, छत्रपती शिवाजी महाराजनगरसह विविध भागांतील अनेक घरांमध्ये शिरले होते. शहरासह वीजवाहिन्यांसह रोहित्रे प्रभावित होऊन जिल्हा अंधारात बुडाला होता. शहरातील पिंप्राळा उपनगरातील बिबानगर, मयूर कॉलनीसह विविध कॉलन्यांतील वीज रोहित्रे प्रभावित झाली होती. वीजवाहिन्यांवर झाडे कोसळली होती. ती पहाटे पाचपर्यंत तोडत वीजपुरवठा सुरळीत केला गेला. मध्यरात्रीनंतर जिल्ह्यातील सुमारे दोन हजार सातशे वीज रोहित्रे प्रभावित होऊन पुरवठा खंडित झाला होता. त्यातील एक हजार 350 रोहित्रांमधून पहाटे पाचपर्यंत पुरवठा सुरळीत करण्यात आला. आता रविवारी (24 सप्टेंबर) महावितरणच्या अभियंत्यांसह तंत्रज्ञ विभागाच्या सुमारे पाच ते सात हजार कर्मचार्यांकडून उर्वरित वीज रोहित्रांचे काम युद्धपातळीवर केले जात असून, सायंकाळपर्यंत पुरवठा सुरळीत सुरू होईल, असा दावा करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील धरणगाव, जामनेर, पारोळा, बोदवड, अमळनेर, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, चोपडा, अमळनेरसह अन्य तालुक्यांतील काही भागांत शनिवारी (23 सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर आलेल्या मुसळधार पावसाने घरांची पडझड होऊन शेतीपिकांचे नुकसान झाले. शेतांनाही तलावाचे स्वरूप आले आहे. घरांचीही पडझड झाली. रस्त्यांचीही दैना झाली असून, त्यांना नदीचे स्वरूप आले होते. शहरातील रस्त्यांची आता आणखी दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांतील खड्डे आता मोठे झाले असून, शहरातून जाणारा महामार्ग ठिकठिकाणी खचला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन, कपाशी, मका, तूर व बाजरी या पिकांना बसला. शेतकर्यांच्या ऐन हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला गेला. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकर्यांना तत्काळ मदत करणे गरजेचे आहे.
अतिवृष्टीसह पुराच्या नुकसानीने जिल्ह्यातील 176 गावे बाधित
दरम्यान, सप्टेंबरमधील आठ दिवसांत अतिवृष्टीसह पुरामुळे 176 गावे बाधित झाली असून, तीन हजार 910 शेतकर्यांना फटका बसला असताना, पुन्हा गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणखीन हजारावर शेतकर्यांना फटका बसला आहे. मात्र, पंचनाम्यानंतरच बाधित शेतकर्यांची संख्या निश्चित होणार आहे. 22 सप्टेंबरला जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात 8, 9, 15, 16, 17 सप्टेंबर या पाच दिवसांत 176 गावांत अतिवृष्टीसह पुरामुळे नुकसान झाले आहे. पुन्हा 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान जामनेर, पारोळा, एरंडोल, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, अमळनेर या तालुक्यांना पुरासह अतिवृष्टीचा दणका बसला. या चार दिवसांत हजारावर शेतकर्यांची पिके हातची गेली असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक फटका कपाशीसह केळीला बसला आहे. सुमारे 10 हजार 293 हेक्टरमधील केळी, तसेच 135 हेक्टरमधील कपाशीचे नुकसान झाले आहे. मुक्ताईनगर, रावेर, चोपडा या तालुक्यांत केळीचे सर्वाधिक, तर जळगावसह चोपडा, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यांत कपाशीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसह पूर व वादळी वार्यामुळे चोपडा तालुक्यातील 90 हेक्टरमधील भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. अन्य तालुक्यांत भाजीपाल्याचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
चाळीसगावातील चार जण दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार
जिल्ह्यासाठी 352 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता पालकमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनाचा आढावा