जळगाव – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आंतरराज्य वरिष्ठ गटाच्या महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या पश्चिम बंगाल संघाला नमवीत महाराष्ट्र संघाने दिमाखात विजय साकार केला. महाराष्ट्र संघातील मुक्ता मगरे हिला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला क्रिकेट स्पर्धा शहरातील अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर झाल्या. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) घेण्यात येणार्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपूर्वी जळगावात प्रथमच होणार्या या स्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पूर्वतयारी स्पर्धा म्हणून बघितले गेले. स्पर्धेत शनिवारी शेवटच्या दिवशी गुणतालिकेत अव्वल पश्चिम बंगाल व द्वितीय स्थानी असलेल्या महाराष्ट्र संघात सामना रंगला. महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. निर्धारित 20 षटकांत नऊ गड्यांच्या मोबदल्यात 108 धावा महाराष्ट्र संघाने केल्या. त्यात तेजल हसबनीस (26), शिवाली शिंदे (24), मुक्ता मगरे (19) यांनी योगदान दिले. पश्चिम बंगाल संघाकडून शलका ईसाब हिने 4 षटकांत चार गडी बाद केले. तिला मिता पाल व माली मंडळ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून साथ दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना पश्चिम बंगाल संघ 18.1 षटकांत फक्त 83 धावांत गारद झाला. महाराष्ट्र संघ 25 धावांनी विजयी झाला.
महाराष्ट्र संघाकडून मुक्ता मगरे हिने 3 गडी बाद केले. मुक्ता मगरे व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करीत एक धावबाद व दोन झेल घेणार्या ईशा पठारे यांना संयुक्तिक सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पेक्स सदस्य अतुल जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, सदस्य युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे, अथांग जैन, अभंग जैन, राजश्री पाटील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीच्या अध्यक्षा रेखा गोडबोले आदी उपस्थित होते.
अंतिम सामन्यात पंच म्हणून संदीप गांगुर्डे, वरुण देशपांडे यांनी, तर गुणलेखक म्हणून मोहम्मद फजल यांनी काम पाहिले. संपूर्ण मालिकेत गोलंदाजी व फलंदाजीने प्रभावित करणार्या महाराष्ट्र संघाच्या मुक्ता मगरे हिला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेत तिने 77 धावा व 9 गडी बाद केले. उत्कृष्ट फलंदाज तेजल हसबनीस (136 धावा), उत्कृष्ट गोलंदाज पश्चिम बंगालची शायिका ईसाब (9 गडी बाद), यष्टिरक्षक त्रिपुरा मोतोची देबनाथ यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संपूर्ण स्पर्धेत जैन इरीगेशनतर्फे करंडक प्रदान करण्यात आले.
अतिवृष्टीचा जिल्ह्याला पुन्हा दणका; पिकांचे नुकसान; 2700 वीज रोहित्रे प्रभावित
चाळीसगावातील चार जण दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार
जिल्ह्यासाठी 352 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता पालकमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनाचा आढावा